शेगांव (डी ललित): शहरात एका तरुणीचा पाठलाग करून लग्नासाठी दबाव टाकणे, विनयभंग करणे तसेच अॅसिड हल्ल्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात शेगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मुरारका कॉलेज येथून रोकडिया नगर येथे पायी जात असताना आरोपी रणपाल राजू गयई याने तिचा पाठलाग केला. सत्पश्रृंगी माता मंदिराजवळ आरोपीने गाडी लावून तिचा रस्ता अडवला आणि “माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू माझ्याशी बोलली नाही तर तुझे शिक्षण बंद करीन,” अशी धमकी दिली. तसेच तिचे फोटो एडिट करून बदनाम करण्याची धमकी देत आरोपीने तिच्याशी जबरदस्ती जवळीक साधून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर दिनांक 24/02/2026 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या रोकडिया नगर येथील घरासमोर आला. त्यावेळी त्याने जोरजोरात शिवीगाळ करत तिच्या आईलाही धमकावले. आरोपीने हातात काचेची बाटली घेऊन “तुमच्या मुलीने माझ्याशी लग्न केले नाही तर तिच्यावर अॅसिड टाकून ठार मारीन,” अशी गंभीर धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच फिर्यादी व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून शेगांव शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी निलेश गाडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून संबंधित तरुणीला संरक्षण देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(युव क्रांती वृत्तसेवा)







