नई दिल्ली (युवा क्रांती वृत्तसेवा) : बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या सरकारने भारतातील विमान कंपनी स्पाइसजेटसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पाइसजेटकडून प्रलंबित थकबाकी अद्याप न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे कोलकाता येथून गुवाहाटी आणि इंफाळकडे जाणाऱ्या काही उड्डाणांवर थेट परिणाम होत आहे. हवाई क्षेत्र उपलब्ध नसल्याने संबंधित विमानांना पर्यायी आणि लांब मार्गाने उड्डाण करावे लागत आहे. त्यामुळे प्रवासाच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता असून वेळापत्रकावरही परिणाम होऊ शकतो.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान वाहतूक शुल्क आणि इतर प्रलंबित आर्थिक बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत नियमित चर्चा सुरू आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, असा कंपनीचा दावा आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून उड्डाणांच्या वेळेत होणाऱ्या संभाव्य विलंबाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणावर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








