मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान येथे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकार्यांसमवेत बैठक पार पडली. महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनवण्याचे शासनाचे महत्त्वपूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ₹10 लाख कोटींचे महामार्ग, बंदरे, विमानतळ, ऊर्जा, शहरी विकास आणि जलपुरवठा यांसारखे पायाभूत प्रकल्प सुरू असून, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गामुळे लॉजिस्टिक्स खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. वाढवण परिसरात देशातील पहिले मल्टी-मोडल हब उभारले जाणार असून येथे पोर्ट, एअरपोर्ट, बुलेट ट्रेन व महामार्गाचे जाळे तयार केले जाईल.

नवी मुंबईत युनिव्हर्सिटी टाउनशिप, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारणीस सुरुवात होणार आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी पुणे, नागपूर, विदर्भ आणि मराठवाडा ही नवी औद्योगिक केंद्रे उभी राहत आहेत.
सौर, वारा, हायड्रोजन आणि स्टोरेज यावर आधारित नूतनीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देत सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे हरित ऊर्जेवर नेण्याचा संकल्पही शासनाचा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच स्पिरिच्यूअल टुरिझम व कोस्टल टुरिझम वाढीसाठी शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्प राबवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.











