मानधन न मिळाल्याने ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचा बेमुदत संप
संग्रामपूर (आकाश बोरसे) : गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने ग्रामीण गृहनिर्माण अभियंते दि. २१ जानेवारीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचा थेट फटका संग्रामपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील हजारो घरकुल योजनांना बसला असून, कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत. परिणामी घरकुल लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ग्रामविकास विभागाला निवेदन
ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेच्या वतीने ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले आहे. थकित मानधन अदा केल्याशिवाय काम करणार नाही, असा ठाम पवित्रा अभियंत्यांनी घेतल्याने घरकुल योजनांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.
केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांवर परिणाम
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की घरकुल लाभ देण्यासाठी —
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
- रमाई आवास योजना
- शबरी आवास योजना
- आदिम आवास योजना
या केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबविल्या जातात. मात्र अभियंत्यांच्या संपामुळे या सर्व योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात सुमारे ५० अभियंते मानधन तत्वावर
जिल्ह्यात सुमारे ५० ग्रामीण गृहनिर्माण अभियंते पंचायत समिती कार्यालयांत मानधन तत्वावर कार्यरत आहेत. या अभियंत्यांनी आपल्या आयुष्यातील ९ ते १० उमेदीची वर्षे याच सेवेत घालवली आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही रोजगाराचा पर्याय उरलेला नाही. मात्र कित्येक महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने या अभियंत्यांची आर्थिक कोंडी झाली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे.
लाभार्थ्यांचे वाढते हाल
घरकुलांची कामे बंद असल्याने अनेक गरजू लाभार्थी अर्धवट घरात राहत असून, पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होणार की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)











