संग्रामपूर [आकाश बोरसे] : सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे. राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखणे आणि सामाजिक सलोखा टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठाणेदार सोनवणे यांनी सांगितले की, सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणारे व्हिडिओ, फोटो किंवा संदेश प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या अफवांना बळी न पडता नागरिकांनी शांतता व कायदा-सुव्यवस्था राखावी. आक्षेपार्ह मजकूर, चित्र किंवा संदेश पुढे पाठविणे देखील दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकारांवर गृहविभाग आणि पोलीस विभागाची करडी नजर आहे.
तसेच, व्हॉट्सअॅप समूह प्रमुखांनी आपल्या समूहातील सदस्यांना सूचित करावे, आक्षेपार्ह माहिती पोस्ट अथवा शेअर करू नये याची खबरदारी घ्यावी. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ठाणेदार सोनवणे यांनी दिला.
नागरिकांनी आपल्या धर्मासोबत इतर धर्माचाही आदर ठेवावा, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन करून त्यांनी म्हटले की, सोशल मीडियावर आक्षेपार्ह माहिती आढळल्यास तामगाव पोलीस स्टेशनला तत्काळ कळवावे. [युवा क्रांती वृत्तसेवा]










