केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश
बुलढाणा (आकाश बोरसे) : परतीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्याभरात सतत पडणाऱ्या पावसामुळे कपाशी, तूर, हरभरा आणि केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे व पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात दिसून आले आहे.
या परिस्थितीची दखल घेत केंद्रीय आयुष, आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार श्री. प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर, शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिकांच्या नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून, राज्य व केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








