संग्रामपूर,(आकाश बोरसे) : दि. २१ जुलै –राष्ट्र प्रथम प्रतिष्ठानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिका-आधारित फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत ५ हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सेवा वरदान ठरत असून अनेक गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
संग्रामपूर तालुक्यातील स्थान वकाना येथील समाजसेवक अविनाश सरांगधर तायडे यांनी २०२१ मध्ये सामाजिक सेवेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून राष्ट्र प्रथम प्रतिष्ठानची स्थापना केली. गरजू व गरीब रुग्णांना शासकीय तसेच निमशासकीय रुग्णालयात पोहोचवणे, डॉक्टरांशी समन्वय साधून उपचार सुरू करून देणे अशी निस्वार्थ सेवा त्यांनी सलग चार वर्षे केली.
या सेवेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी २०२३ मध्ये संस्थेच्या नावाने सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यात आली. ज्या गावांमध्ये शासकीय आरोग्य पथक नियमित पोहोचत नाही, त्या गावांमध्ये ही रुग्णवाहिका फिरता दवाखाना म्हणून कार्यरत आहे.
या रुग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक औषधसाठा, ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असून चालकाचा संपर्क क्रमांक तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांनाही देण्यात आला आहे. नियोजनानुसार दर आठवड्याला एका गावात मोफत आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचार शिबिर आयोजित केले जाते.
या उपक्रमामुळे अपघातग्रस्त, गरोदर महिला, कर्करोग, हृदयविकाराचा झटका आलेले रुग्ण तसेच इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे राष्ट्र प्रथम प्रतिष्ठानचा हा उपक्रम संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








