जळगांव जा. (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगाव जामोद बसस्थानक परिसरातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जळगांव जामोद पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मुली बसस्थानक परिसरात दिसल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्या. पालकांनी परिसरात शोध घेतला मात्र मुलींचा कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संशयित हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. तसेच इतर पोलीस ठाण्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे. मुली लवकरात लवकर सुरक्षितपणे मिळाव्यात यासाठी पोलिसांचे पथक सतत प्रयत्नशील आहे.
या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती दिसल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












