जळगाव जामोद, (आकाश बोरसे ): बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणखी एक दुर्दैवी घटना घडली असून, मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका 29 वर्षीय तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. तब्बल 15 तासांच्या शोधानंतर नातेवाईकांनी पाण्यात उतरून त्याचा मृतदेह बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश तेरसींग भाबर (वय 29, रा. उसनी, ता. खकणार, जि. बुरहानपूर, मध्यप्रदेश) हा तरुण जळगाव जामोद तालुक्यातील इसाई येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. 31 जुलै रोजी तो अकोली-चांगेफळ परिसरात मासे पकडण्यासाठी गेला होता.
मासेमारी करत असताना त्याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. पाण्यातील जाळे व इतर मासेमारीच्या साहित्यामध्ये तो अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नाही आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेनंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर सुमारे 15 तासांनंतर नातेवाईकांनी पाण्यात उतरून त्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, वरवट बकाल येथे पाठविण्यात आला.
अतिवृष्टीमुळे नद्या, नाले व जलाशय धोकादायक बनले असून, प्रशासनाने नागरिकांना खोल पाण्यात उतरणे व मासेमारीसाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻








