जामोद | (आकाश बोरसे) : दि. ८ जुलै रोजी जामोद येथे स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांनी आगळे-वेगळे आंदोलन करत आपल्या घरातील नवीन स्मार्ट मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा केले. तसेच गावातील सर्व स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शाखा अभियंता चौबारावाले आणि सहाय्यक अभियंता हिंगणे यांना निवेदन देण्यात आले.
समाधान दामधर यांनी इशारा देत सांगितले की, “सात दिवसांच्या आत स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवावेत. अन्यथा नागरिक स्वतः मीटर काढून महावितरण कार्यालयात जमा करतील आणि पुढे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी महावितरणची राहील.”
निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, ते अनेक वर्षांपासून नियमित वीजबिल भरणारे ग्राहक आहेत. त्यांच्या जुन्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना पूर्वसूचना किंवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आले. त्यामुळे जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात गणेश धर्मे, शंकर दामधर, राजू धुर्डे, रमेश धुर्डे, महादेव रांदळे, दीपक धर्मे, शेख मुसा, देवकाबाई दामधर, संतोष दलाल, सचिन काळपांडे, विश्वनाथ काळपांडे, प्रमोद हांडे, मोहन धुर्डे, सुनील काळपांडे, गजानन काळपांडे, संतोष राठी, समाधान वानरे, समाधान पिंजरकर, अमोल ढगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)









