बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २ जून-खामगाव–जालना विशेष रेल्वे प्रकल्पाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाची राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे मार्गाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
162 किलोमीटर लांबीच्या नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाडा यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होईल तसेच उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक खर्चातही बचत होणार आहे. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे.
प्रकल्पाचे प्रमुख फायदे
- विदर्भ–मराठवाडा संपर्क अधिक मजबूत होणार
- उद्योग, व्यापार व रोजगाराला चालना मिळणार
- शेतकरी व सर्वसामान्यांसाठी वाहतूक सुलभ होणार
- प्रवासाचा वेळ व खर्च कमी होणार
- बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार








